सोमवार, २१ मार्च, २०१६

रामरक्षेविषयी खुप महत्वाचे....(एक सत्यकथा) 


मला आता नेमकं आठवत नाही की मी ही कथा कुठे वाचली ते, पण अगदी लहानपणी किंवा शाळेत असताना कल्याण किंवा तत्सम कुणा मासिकात ही कथा वाचलेली मला  व्यवस्थित आठवते आहे....१९८२ ते १९८५ या काळात भारतातील एक मुलगी कोणत्यातरी कामानिमित्ताने काही काळ अमेरिकेत रहात होती, बहुदा ब्रुकलिन किंवा तत्सम भागात तिला रहावे लागत होते. एकदा अशीच उशीराने काम, शॉपिंग आटोपून ती घरी परतत होती. दुर्दैवाने तिला टॅक्सी मिळाली नाही, उशीर झाला होता तेव्हा आपण चालत गेलेलं उत्तम असं वाटून तिने चालायला सुरुवात केली. तिला ज्या भागातून घरी जायचे होते तो भाग ब्रुकलीनमधला अतिशय असुरक्षित होता व तिथे गुन्हेगारी वृत्तीची माणसे, ब्लॅक्स, गुंड, रेपिस्ट यांचा राबता होता. रात्री नाक्यानाक्यावर उभं राहून टवाळक्या करणं, लुटमार करणं, बलात्कार करणे हा त्यांचा उद्योग होता....हिला जाणं भाग होतंच. जवळपास दीडेक किलोमीटर चालावे लागणार होते, तिला या कसोशीच्या प्रसंगी सुदैवाने रामरक्षा आठवली व तिने मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली.....


रामरक्षा मनन  सुरु असतानाच ती त्यातल्या एका ओळीपाशी अडली, थांबली. ती ओळ म्हणजे ......


आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥


अर्थ:- सज्ज धनुष्ये धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे, व अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम-लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत. ॥

Rama and LakShmana (both), their bows pulled and ready, their hands on the

arrows (packed) in ever full quivers (carried on their backs), may they

always escort me  in my path, for my protection .


...तिला या ओळीचा अर्थ माहिती होता. आणि आत्ता याक्षणी ही ओळच महत्वाची होती. तिने अत्यंत हुशारीने पुढील स्तोत्र म्हणण्याऎवजी, एखादा मंत्र म्हणावा तसा या ऋचेचाच जप सुरु केला. घाईघाईने चालत होती. आसपास टवाळ पोरांचे आचकट विचकट बोलणार ग्रुप होते, गंमत म्हणजे ही जवळ आली की प्रत्येक ग्रुप गप्प बसायचा, पुढे येऊन हिची चेष्टा मस्करी करण्याऐवजी पोरं निघून जायची किंवा गप्प बसायची...सरतेशेवटी ही पदयात्रा संपत आली. एका ग्रुपमध्ये तिला तिच्या ओळखीचा त्याच भागात रहाणारा एक ब्लॅक मुलगा दिसला, तो ओळखीचं हसला. ही पुढे घरी निघुन आली. उरलेली रामरक्षा पूर्ण केली. देवाला हात जोडले, प्रार्थना केली व आभारही मानले....


दुसरे दिवशी सकाळी बाहेर गेलेली असताना तोच कालचा मुलगा तिला भेटला, त्याने मुद्दामहून हिला थांबवलं आणि विचारलं....."काल काय प्रॉब्लेम झाला होता. अगदी दोन दोन पोलिस ऑफिसर्सच्या एस्कॉर्टमध्ये चालली होतीस घरी?" त्यावर ती म्हणाली, "कोणते दोन पोलिस ऑफिसर्स?" तो म्हणाला, "अगं असं काय करतेस. तुझ्या पुढे दोन मजबूत शरीरयष्टीचे, रिव्हॉल्व्हर घेतलेले गोरे पोलिस ऑफिसर्स चाललेले मी स्वत: बघितले. म्हणूनच कोणत्याही ग्रुपने चेष्टामस्करी करण्याची हिम्मत केली नाही..." ही नि:शब्द झाली....


मित्रांनो,मी वाचलेली ही कथा जशी आठवली तशीच लिहिली आहे. यात सत्याचा भाग किती? ते तुम्ही ठरवा. पण आजही प्रभू श्रीराम आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात, आणि जगाच्या पाठीवर कुठेही  त्यांचं रक्षण करतात हे मात्र नक्की आहे, यावर माझा नितांत विश्वास आहे...


॥ श्रीरामलक्ष्मण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc